अतिवृष्टीमुळे भाताची तरवे कुजून गेल्याने नुकसान; पाटण तालुक्यात ओला दुष्काळसदृश्य स्थिती

0
159
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पेरणी खोळंबली असून पावसामुळे भाताची तरवे देखील कुजून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोयना धरण क्षेत्र असलेला व नैसर्गिक आपत्तीने घेरलेला तालुका म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. अतिवृष्टी, पूर, भूकंप, भुस्खलन, जंगली प्राण्यांकडून पिकांचे नुकसान आदी नैसर्गिक संकटे येथील शेतकऱ्यांना कायम असतात. यावर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांची दाणादाण उडालेली असून मे महिन्यापासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तालुक्यात भाताचे प्रमुख पीक घेतले जाते. यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांनी भाताची लागण करण्यासाठी कृषी दुकानातून विविध वाणाचे भात बियाणे खरेदी केले. शेतामध्ये बियाणे पेरून भाताची तरवे घेतली. मात्र, त्यानंतर सततच्या पावसाने पेरणी केलेल्या भाताच्या तरवांमध्ये पाणी साचल्यामुळे तरवे कुजली आहेत. आता भाताची लागण कशी करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्या कारणाने पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे. कारण यापुढे जुलै, ऑगस्ट महिन्यात पाऊस थांबेल याची शाश्वती नाही. त्यामुळे पेरण्या करता येत नाहीत. भुईमूग, हायब्रीड, सोयाबीन, चवळी, नाचणी, वरी, सूर्यफूल आदी खरीप पिके पाटण तालुक्यात घेतली जातात. काही शेतकऱ्यांनी गडबड करून खरीप पिकाची थोडीफार पेरणी केलेली आहे. मात्र, अति पावसामुळे ती वाया गेलेली आहे. शेतामध्ये पेरलेले बियाणे पावसामुळे उगवले नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.