अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी; पालकमंत्री शंभुराज देसाईंचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असून सर्व शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे. ज्या संवेदनशील ठिकाणी लोकांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी कोणताही धोका न पत्करता तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करावे, स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना अन्न, शुध्द पेयजल, पांघरुण, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करुन देण्याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी नुकताच दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसलिदार, गट विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, आरोग्य अधिकारी आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला.

यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत, काही ठिकाणी रस्ते खचत आहेत, पूल वाहून जात आहेत, दरडी कोसळत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ज्या संवेदनशील ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर आवश्यक आहे, अशा ठिकाणी मंगलकार्यालये, मोठी सभागृहे, शाळा, आदी सुरक्षित ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करावे. त्यांना निवारा अन्न, शुध्द पेयजल, अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद द्यावा, संवेदनशील भागात पोलीसांची गस्त वाढवावी. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरु नये यासाठी प्रशासकीय यंत्रणांची पथके तयार करावीत. या पथकांनी संवेदनशील ठिकाणी भेटी द्याव्यात. दरड कोसळण्याची ठिकाणे असणाऱ्या भागात यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, दरडी कोसळण्याच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या 41 गावांतील लोकांचे त्वरीत स्थलांतर करावे, त्यांना अन्न, शुध्द पेयजल, औषधे, आदी आवश्यक सुविधा, उपलब्ध करुन द्याव्यात. स्थलांतरीत ठिकाणी आवश्यकतेनुसार जनावरांच्या चाऱ्याची तजवीज ठेवावी. स्थलांतरीतांपैकी कोणीही रात्री घरी जावू नये याची बचाव यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. अन्नाची पाकीटे, कोरडे खाद्यपदार्थ उपलब्ध ठेवावेत. वैद्यकीय पथकांनी लोकांना स्वत: जावून भेटी द्याव्यात व भेटीचा अहवाल सादर करावा. आरोग्य यंत्रणेने जलजन्य आजार, सर्पदंश यावरील आवश्यक पुरेसा औषध पुरवठा उपलब्ध ठेवावा. वादळवारे, पाऊस यासारख्या कारणांनी विद्युत पुरवठा खंडीत झाला असेल तेथील विद्युत प्रवाह विद्युत विभागाने लवकर सुरू करावा. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करावे.