कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच आहे. दरम्यान, पश्चिम भागात जोर कमी झाला असला तरीही धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात साठा वाढत आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणात ५६ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे.
मागील जून महिन्यात जसा मुसळधार पाऊस कोसळला त्याप्रमाणेच या जुलै महिन्याची सुरुवात देखील मुसळधार पावसाने झाली. अतिवृष्टीचा अनेक घटकांवर देखील बघिर परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. जनजीवनावर देखील मोठा परिणाम झाला. सध्या पश्चिमेकडील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आवक कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. बहुतांश मोठे प्रकल्प ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. यामुळे धरणांमधून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. परिणामी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.
कोयना धरणक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात २८ हजार क्यूसेक वेगाने पाण्याची वाहक होती. धरण पाणीसाठा ५६.०३ टीएमसी झालेला असून, पाणीसाठ्याची टक्केवारी ५३.२४ इतकी आहे. २४ तासांत धरणात सुमारे अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यातच धरणातील साठा वेगाने वाढत असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी नदी विमोचक द्वारमधूनही विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेतून विसर्ग वाढणार आहे.
परिणामी कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सहा धरणात ५७ टक्के पाणीसाठा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे सहा मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने या मोठ्या प्रकल्पात एकूण ८४.२१ टीएमसी पाणीसाठा निर्माण झालेला आहे.