सातारा प्रतिनिधी | कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रासाठी आजपासून दिनांक २९ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या घाट क्षेत्रांतील काही ठिकाणी पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने वर्तवली आहे.
कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाने हजार मिलिमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद 31 हजार 252 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनीत्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.
धरणातून सोडलेले पाणी व कोयना नदी क्षेत्रात पडणारा पाऊस यामुळे अनेक ठिकाणी कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील गावे, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. सध्या कोयना धरणात एकूण 40.94 टीएमसी उपलब्ध तर 35.94 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.