पावसाच्या पुनरागमनाने वाईसह पाचगणी परिसरात पेरणीला आला वेग

0
92
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून २९ जून पर्यंत ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने शेतीच्या कामांना अखेर वेग आला आहे. सुरुवातीच्या अतिवृष्टीमुळे लांबलेल्या पेरण्या आता पुन्हा एकदा सुरू झाल्या असून, बळीराजाची शेतामध्ये पेरणीसाठी लगबग पाहायला मिळत आहे.आतापर्यंत तालुक्यात सुमारे 50 टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.

सातारा जिल्ह्यात कधी नव्हे तो मे महिन्यापासून पावसाळा सुरुवात झाली आहे. अगोदर वळीवाचा नंतर मान्सून पाऊस सुरु झाल्यामुळे तसेच सततच्या पावसामुळे जमिनीत वापसा (पेरणीयोग्य ओल) नसल्याने मृग नक्षत्रातील कडधान्यांची पेरणी खोळंबली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून दिवसा कडक ऊन पडत असल्याने जमिनीने उसंत घेतली आणि पेरणीसाठी आदर्श स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीतील पेरणीला वेग आला आहे.

तथापि, ज्या शेतकर्‍यांनी अतिपावसातच पेरणीची घाई केली होती, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, या पावसाचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे तालुक्यातील सर्व लहान-मोठे बंधारे तुडुंब भरले आहेत. धोम, बलकवडी आणि नागेवाडी या प्रमुख धरणांमधील पाण्याची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे, ज्यामुळे पिकांच्या पाण्याची चिंता मिटली आहे