अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये वाढले अडीच TMC पाणी

0
266
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | यंदाच्या वर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात अडीच टीएमसीने वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा धरणात निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलने कोयना धरणात 7.02, कण्हेरमध्ये 2.48, उरमोडी 3.17 टीएमसी जादा पाणीसाठा शिल्लक आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस दुष्काळी माण, खटाव व फलटण तालुक्यांत झाला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मिळून सरासरी 293.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सातारा तालुक्यात 305, जावळी 340, पाटण 286, कहर्‍हाड 246, कोरेगाव 338, खटाव 282, माण 270, फलटण 367, खंडाळा 257, वाई 279. महाबळेश्वर 297मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यात तब्बल अडीच टीएमसीने वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रमुख धरणातील पाणीसाठा जास्त आहे. गेल्या वर्षी जून 2024 मध्ये धरणात कोयना 10.65, धोम 2.69, धोम-बलकवडी शून्य, कण्हेर 1.14, उरमोडी 0.43, तारळी 1.33, येरळवाडी शून्य इतका पाणीसाठा शिल्लक होता. धोम, उरमोडी, धोम बलकवडीत मृत साठा शिल्लक होता. मात्र, यावर्षी मे महिन्याच्या 14 ते 29 तारखेपर्यंत झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणात कोयना 17.69, धोम 3.24, धोम बलकवडी 0.30, कण्हेर 3.62, उरमोडी 3.60, तारळी 1.36, येरळवाडी 0.69 इतका पाणीसाठा झाला आहे. सध्या धोम बलकवडीतून 550 क्युसेक, कण्हेर 40, येरळवाडी 1223 क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.

हिंगणगाव (ता. फलटण) येथील बुरसुंडी धरणात यंदा अत्यल्प कालावधीत पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. मध्यंतरी सलग पाच दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे सध्या हे धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे हिंगणगाव, कापशी व आदीं बुद्रुक, टाकुबाईचीवाडी परिसरातील शेतकर्‍यांची पाणी समस्या सुटली असून, खरीप हंगामासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पेरण्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यंदा मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चांगल्या उत्पादनाची आशा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. बुरसुंडी धरण हे 1972 मध्ये बांधले गेले. त्यानंतर ते प्रथमच मे महिन्यात भरले आहे.