कोयनेच्या आपत्कालीन दरवाजातून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सध्या सांगलीत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दुष्काळीस्थिती वाढलयामुळे कोयना सिंचन विभागाकडे वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. या मागणीची दखल घेत कोयना धरणातून सिंचनासाठी विसर्ग वाढविण्यात आला आहे. यासाठी पुन्हा धरणाचे आपत्कालिन दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून सांगलीसाठी ५०० आणि पायथा वीजगृहातील २१०० असा २६०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात असलेल्या धरणातील पाणी जिल्ह्याबरोबरच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठी सोडले जाते. गेल्यावर्षी अपुऱ्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली नाहीत. तर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना असून याची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी असून देखील धरणातील पाणीसाठाही ९५ टीएमसीपर्यंत पोहोचलेला. त्यामुळे धरण भरण्यास १० टीएमसी पाणी कमी पडले. त्यातच गेल्यावर्षी परतीचा पाऊसही अपेक्षित झाला नाही. परिणामी नोव्हेंबर महिन्यापासून दुष्काळी झळा जाणवत होत्या. अशातच शेतीसाठीही पाणी कमी पडत होते. त्यामुळे सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून नोव्हेंबरपासूनच कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी झाली.

या मागणीनुसार कोयनेतून विसर्ग सुरू करण्यात आला असून धरणातून मागील तीन महिन्यांपासून सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीसाठी धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू करुन त्यातून २१०० क्यूसेक पाणी कोयना नदीत सोडले जात होते. तर धरणाच्या आपत्कालिन दरवाजामधील विसर्ग थांबविण्यात आलेला होता. मात्र, सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढलयामुळे धरणाचे आपत्कालिन
दरवाजे पुन्हा खुले करण्यात आले आहे.

त्यामधून ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या सांगलीतील सिंचनासाठी एकूण २६०० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. दरम्यान, कोयना धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. सध्या ६०.५० टीएमसी पाणी शिल्लक आहे. १ जूनपर्यंत धरणातील पाणी पुरवावे लागणार आहे. तर धरणात गेल्यावर्षीपेक्षा पाच टीएमसी पाणीसाठा कमी आहे.