कराड प्रतिनिधी | वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी निघालेल्या विवाहितेच्या गळ्यातील सुमारे आठ तोळ्यांचे गंठण धूमस्टाइलने चोरट्यांनी लंपास केले. गोळेश्वर येथील कदम वस्तीत मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत रूपा संदीप कदम यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळेश्वर येथील कदम वस्तीत राहणाऱ्या रूपा कदम या आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी निघाल्या होत्या. मोठी जाऊ कविता कदम या पूजेसाठी येणार असल्यामुळे रूपा कदम त्यांना बोलविण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाल्या होत्या. रूपा कदम या त्यांच्याकडे चालत जात असताना दुचाकीवरून दोघे जण त्यांच्या पाठीमागून आले.
त्या जावेला बोलविण्यासाठी हाका मारीत असताना दोघांनी अचानक त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले. आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. चोरट्यांनी रूपा कदम यांच्या गळ्यातील सुमारे चार लाख ८० हजार रुपये किमतीचे सुमारे आठ तोळे दागिने लंपास केले.