सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील धरणातही पाणी पातळीत होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ४०.८३ टीएमसी पेक्षा जास्त म्हणजेच २६ ते २७ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. माण, खटाव, फलटण तालुक्यात जोरदार पावसामुळे येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी चार प्रकल्प मे महिन्यांतच शंभर टक्के भरले आहेत. अजूनही जिल्ह्यात माण, खटावसह कराड व पाटण तालुक्यात पाऊस पडत आहे.
सातारा जिल्ह्यात कधी नव्हे ते मेमध्ये मुसळसार पाऊस झाला. यामुळे धरणसाठ्यात बऱ्यापैकी भर पडली. यावर्षी जानेवारीपासूनच अनेक धरणांतील पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले होते. पाण्याची वितरण व्यवस्थित झाल्याने पाणीसाठा शिल्लक होता. त्यातच मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे पाणीसाठी वाढण्यास मदत झाली आहे.
राज्याच्या वीज निर्मितीच्या दुष्टिने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात २४ टीएमसी म्हणजेच २१.७१ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. धोम धरणात ५.०६० टीएमसी म्हणजेच ३७.४१ टक्के, धोम-बलकवडी ०.४१० टीएमसी म्हणजेच ७.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
दुष्काळी तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या उरमोडी धरणात ३.९२० टीएमसी म्हणजेच ३९.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कण्हेर धरणात ४.१४० टीएमसी म्हणजेच ४०.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तारळी धरणात १.३७० टीएमसी म्हणजेच २३.२ टक्के पाणी शिल्लक आहे. तसेच जिल्ह्यातील या धरणामध्ये जसा पाऊस पडेल तस तशा अजून पाणी साठ्यात वाढ होत आहे.