कोयना जलाशयात वादळी वाऱ्याने स्पीड बोट पलटी; एकजण बुडाला तर दोघे पोहत बाहेर आले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात मोठी दुर्घटना घडली आहे. वादळी वाऱ्यात स्पीड बोट पलटी होऊन एक जण जलाशयात बुडाला असून दोघेजण सुदैवाने बचावले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला, मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड पावसामुळे शोधकार्यात अडथळे आले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.

कामाची पाहणी करून माघारी येताना घडली दुर्घटना

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोयना जलाशयावर तापोळा ते आहिर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळी कामाची पाहणी करण्यासाठी काही अधिकारी बोटीने तापोळ्याला गेले होते. पुलाच्या कामाची पाहणी करून माघारी येत असताना तेटली (ता. जावली) हद्दीत वादळी वाऱ्यामुळे स्पीड बोट जलाशयात पलटी झाली. यावेळी गजेंद्र बबन राजपुरे (वय ४२, वर्षे रा. दरेवाडी, ता. वाई) यांचा बुडून मृत्यू झाला. सतीश थोरवे (वय ५२, रा. वाई), बालेश्वर महातो (वय ४२) हे बचावले आहेत.

अंधारामुळे शोध मोहीम थांबवली

जलाशयात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. महाबळेश्वर ट्रेकर्सला पाचारण करण्यात आले आहे. आता शुक्रवारी सकाळी शोध मोहीम सुरू होणार आहे.

बांधकाम कंपनीचा निष्काळजीपणा?

तेटली (ता.जावली) हद्दीत घटलेल्या या घटनेत कंपनीचे दोन अधिकारी बचावले, मात्र एकाचा बुडून मृत्यू कसा झाला? त्यांनी लाईफ जॅकेट परिधान केले नव्हते का? बोट कोणाच्या मालकीची होती? बोट चालकाकडे प्रवाशी वाहतुकीचा परवाना होता का? असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.