…तर 35 हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती; मंत्री शंभूराज देसाईंचा पाटणकरांना टोला

0
506
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पाटणच्या सत्यजित पाटणकर यांनी नुकतीच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर ” आम्ही काय गुवाहाटी मार्गे पक्ष प्रवेश केला नाही”, असे म्हणत टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता मंत्री देसाई यांनी यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. “१९९७ ला शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला तो आजही कायम आहे. पण, काॅंग्रेसमधून राष्ट्रवादी, नंतर अपक्ष, पुन्हा तुतारी आणि आता कमळ असा प्रवास करणाऱ्यांनी किती पक्ष बदलले ते पहावे. आम्ही गद्दारी केली असती तर ३५ हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती, असा जोरदार टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना लगावला.

सातारा येथील निवासस्थानी पालकमंत्री देसाई यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मी एकही शब्द बोललेलो नाही. त्यांनी माझा सुरत, गुवाहाटी गेले असा उल्लेख केला आहे. त्यांचे जसे विषय समोर येतील ते सर्व मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहे. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास मी त्यांच्याविरोधात बोलेन. पण, त्यांनी काॅंग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, तुतारी आणि कमळ असा प्रवास केला आहेच ना ? त्यांनी किती पक्ष बदललेत ते पहावे.

आपली कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे का ? असा प्रश्नही पत्रकारांनी पालकमंत्री देसाई यांना केला. यावर त्यांनी कोंडी कोण कोणाची करते यावर आता बोलणे योग्य नाही. पण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळ द्यावा. त्यांच्या कार्यालयाकडे वेळ मागितलेली आहे. त्यांच्याशी याबाबत बोलणार आहे, असे स्पष्ट केले.