सातारा प्रतिनिधी | गेल्या तीन-चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. धरणात प्रतिसेकंद 1,336 क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या 17.43 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. दरम्यान, अजूनही मुसळधार पाऊस कोसळत असून सातारा जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच पुढील ३ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
यंदा मान्सून तब्बल 12 दिवस आधी राज्यात दाखलं झाला आहे. साधारणपणे 7 जूनच्या आसपास मान्सून राज्यात दाखल होत असतो. मात्र, यावर्षी 25 मे रोजीच मान्सूननंराज्यात प्रवेश केला. आता पुन्हा एकदा पावसानं दमदार पुनरागमन केलं आहे. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे कराड ते चिपळूण या मार्गावर कोयनानगर जवळील वाजेगाव येथे मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने तयार केलेला पर्यायी रस्ता सोमवारी सकाळी पाण्याच्या तडाख्याने वाहून गेला. परिणामी या मार्गावरील वाहतूक सोमवारी दुपारी पूर्णपणे ठप्प झाली.