गौतम अदानी जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी उभारणार जलविद्युत प्रकल्प?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । उद्योगपती गौतम अदानींची महाराष्ट्रातील ज्या ठिकाणावर अथवा प्रकल्पावर नजर पडली कि तो त्यांना मिळणारच अशी सध्या परिस्थिती आहे. राज्यातील अनेक मोठे प्रकल्प सध्या अदानींच्या ताब्यात आहेत.आता अदानींच्या समूहाला महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगेत तीन जलविद्युत प्रकल्प करण्यास केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. हि परवानगी देताना केंद्राने अनेक कायद्यांना धाब्यावर बसवले आहे. आर्टिकल १४ या संस्थेनं नुकताच याबाबतचा वृत्त अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अदानी समूहाच्या एका कंपनीला केंद्र सरकारकडून पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्हांमध्ये प्रत्येकी एक जलविद्युत प्रकल्प बांधण्याची प्राथमिक परवानगी जुलै २०२३ मध्ये देण्यात आली आहे. कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार आणि केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञांनुसार या प्रकल्पांमुळे सह्याद्रीच्या जैववैविध्याला मोठा फटका बसू शकतो. असे असताना देखील केंद्र सरकारने परवानगी दिली कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यातील डांगीस्तेवाडी गावात गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून तारळी पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट उभारणीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तारळी धरण आणि आणखी एका जलाशयाची उभारणी करुन १५०० मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं या प्रकल्पासंदर्भात पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणीला उपस्थित राहून आक्षेप नोंदवावेत असे सांगण्यात आले आहे.

श्रमिक मुक्ती दल करणार प्रकल्पास विरोध : डॉ. भारत पाटणकर

तारळी पीएसएचपी १५०० मेगावॅटच्या प्रकल्पाबाबत १२ मार्च रोजी पाटण तालुक्यातील कळंबे गावात गगनगिरी महाराज मठ येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांना या प्रकल्पाबाबत सूचना आक्षेप नोंदवण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देखील देण्यात आला आहे. या सुनावणीस श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी उपस्थित राहतील. जो काःगी प्रकल्प अदानी समूहाकडून उभारला जाणार आहे. त्याबाबत त्यांनी पर्यावरणाची जी काही हानी होणार आहे त्याचा विचार केला आहे का? आता पर्यंत हि माहिती राज्यातील व जिल्ह्यातील जनतेपासून का लपवून ठेवण्यात आली होती? याचा खुलासा अदानींनी करावा, असा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना केला.

नेमका कसा असेल प्रकल्प?

उदयोजक गौतम अदानी यांच्या तारळी पीएसएचपी प्रकल्पाची उभारणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डांगिस्तेवाडी येथे प्रस्तावित आहे. बामनेवाडी, मुरुड येथील सध्याच्या तारळी धरणाचा खालच्या भागातील जलाशय म्हणून वापर करण्यात येईल. याशिवाय त्याच्या जवळ अजून पाटण तालुक्यातील निवडे गावात अजून एक धरण बांधलं जाईल. त्याचा वापर वरच्या भागातील जलाशय म्हणून केला जाईल. निवडे येथे ११.३६ एमसीएम (०.४०) टीएमसी पाणी साठवण क्षमतेचं धरण बांधलं जाईल, धरणाच्या भिंतीची उंची ६१.५ मीटर असणार आहे.

प्रकल्पाबाबत हरकती सादर करण्यास एका महिन्याची मुदत

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पबाबत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे, सातारा येथील कार्यालयांसह इतर कार्यालयात माहिती असलेली कागदपत्रे उपलब्ध आहेत. दरम्यान, या प्रकल्पाबाबत सूचना, आक्षेप, टीका टिप्पणी करायच्या असल्यास एका महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. यासंदर्भातील जनसुनावणी देखील मार्च महिन्यात होणार आहे.