सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची हजेरी लागत असून नवजाला एक जूनपासून आतापर्यंत १०९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत १७ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.
सातारा जिल्ह्यात मे महिन्याच्या उत्तरार्धात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ओढे, बंधारे भरून वाहत आहेत. तसेच तलावातही मोठ्या प्रमाणात साठा झालेला आहे. पण, मे महिना सुरू झाल्यापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पश्चिम भागातच तुरळक प्रमाणात हजेरी लागत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त २ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तर नवजाला १७ मिलिमीटरची नोंद झाली. महाबळेश्वरला काहीच पाऊस झालेला नाही.
त्यातच पश्चिमेकडे पाऊस कमी असल्याने कोयना धरणातील पाण्याची आवकही थांबलेली आहे. पण, सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात २२.६५ टीएमसी पाणीसाठा होता. तर जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. पण, यापुढे पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरणीला अडथळा येऊ शकतो. कारण, अजूनही जमिनीत चांगलीच ओल आहे. यामुळे पेरणी रखडलेली आहे.