सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर छोटे छोटे धारण देखील ओव्हरफ्लो झाले आहेत. दरम्यान, संपूर्ण सातारा शहराला पाणी पुरवठा करणारे कास धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गुरुवारी रात्र कास धरण ओव्हरफ्लो झाल्याचे पहायला मिळाले.
सततच्या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून कास धरणातून सातारा शहराला नियमितपणे पाणीपुरवठा केला जातो. कास पठार परिसरातील 15 गावांना देखील कास धरणातून पाणीपुरवठा केला जातो. भारतीय हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासाकरिता सातारा घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
सातारा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. साताऱ्यातील निसर्ग आता पर्यटकांना खुणावत आहे. मात्र पर्यटकांना अनेक पर्यटनस्थळावर इच्छा असूनही जाता येणार नाही. कारण पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्वच पर्यटनस्थळे 19 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद असतील.