सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील अविृष्टीने बाधित गावांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी अतिवृष्टीने माण तालुक्यात अनेक गावे बाधित झाली आहेत. यामध्ये शेतांचे, घरांचे, पशुधनाचे तसेच रस्त्यांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या मदतीपासून बाधित एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
या पाहणीप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांताधिकारी उज्वला गाडे, तहसीलदार विकास अहिर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ज्या ठिकाणी रस्ते खचले आहेत त्या ठिकाणी तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी. वाहून गेलेल्या पुलांच्या ठिकाणी नवीन पुलाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावेत. अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचेही पंचमाने लवकरात लवकर पूर्ण करावेत. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरेही पडली आहेत, बाधितांना तात्काळ मदत मिळवून द्यावी, अशा सूचनाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गोरे यांनी दिले.