सातारा जिल्ह्यात पावसाची पश्चिमेकडे पुन्हा रिपरिप; महाबळेश्वर, नवजाचा पावसाची ‘इतकी’ नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरु असून पश्चिम भागात गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १२३ तर महाबळेश्वरला १०४ मिलमीटरची नोंद झाली. तर आता नवजाच्या पावसानेही एक हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला असून कोयना धरणातील पाणीसाठाही १७ टीएमसीजवळ पोहोचला आहे. मात्र, पेरणींसाठी अजून पावसाची आवश्यकता आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊन पूर्व तसेच पश्चिम भागात चांगला पडला. त्यामुळे पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर परिसरातीलओढे खळाळून वाहू लागले. त्यानंतर मात्र, दोन ते तीन दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर बळीराजाची चिंताग्रस्त झाला होता. तर पेरण्याची रखडल्या आहेत. मात्र, गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याचे चित्र पहायला मिळाले.

शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर नवजाला १२३ आणि महाबळेश्वरमध्ये १०४ मिलीमीटर पाऊस पडला. नवजाला आतापर्यंत १०२७ मिलमीटरची नोंद झाली. तर महाबळेश्वरचा पाऊस ११२९ मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे. त्यातच शुक्रवारी सकाळपासूनही या भागात पाऊस सुरुच होता. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे.

धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद

सकाळच्या सुमारास धरणात ५१७२ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा १६.५४ टीएमसी झाला होता. सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान, कोयना धरणातील पाणीसाठा वाढत आहे. त्याचबरोबर धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडी या प्रमुख धरणांतही पाण्याची आवक हळूहळू सुरू आहे. तर पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी पूर्वेकडील खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे.