सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे कोयना, धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, वीर धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेच्या पायथा वीज गृहातून तर वीर व कण्हेर धरणांच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात २० लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.
पावसाची पश्चिमेकडील बरसात कायम आहे. रविवारीही उघडझाप करणाऱ्या पावसाने डोंगरदऱ्यात जोरदार बॅटिंग केली. अधूनमधून उघडीप दिल्यासारखे वातावरण दिसले तरी पुन्हा आलेल्या पावसाच्या सरींनी पुन्हा वातावरण चिंब करून टाकले. सातारा, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, कराड या तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम राहिली. धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
वीरधरणातून दुपारी १२ वाजल्यानंतर धरणाच्या विद्युतगृहाद्वारे २ हजार १०० क्युसेक तर सांडव्याद्वारे ४ हजार ६३७ क्युसेक असे मिळून ६ हजार ७३७ क्युसेक विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. कोरेगाव तालुक्यातील देऊर हा लघुप्रकल्प रविवारी १०० टक्के भरल्याने सांडव्यावरुन प्रवाह सुरु झाला आहे.
धरणातील पाण्याची स्थिती अशी
कोयना धरण : कोयना धरणात आजचा पाणीसाठा ३६.५६० टीएमसी असून आजची उपयुक्त टक्केवारी ३१.४० टक्के आहे. धरणात पाण्याची आवक २० हजार ९११ क्युसेक असून १ हजार ५० क्युसेक विद्युत गृहातून विसर्ग सोडण्यात येत आहे.
धोम धरण : धोम धरणात आजचा पाणीसाठा ७.०१० टीएमसी आहे. आजची उपयुक्त टक्केवारी ४४.४८टक्के असून धरणात पाण्याची आवक २ हजार ३५ क्युसेक होत आहे.
धोम बलकवडी धरण : धोमबलकवडी धरणात आजचा पाणीसाठा ०.६७० टीएमसी आहे. आजची उपयुक्त टक्केवारी १३.८९ टक्के असून धरणात पाण्याची आवक ५६० क्युसेक होत आहे.
कण्हेर धरण : कण्हेर धरणात आजचा पाणीसाठा ५.६२० टीएमसी आहे. आजची उपयुक्त टक्केवारी ५३. २८ टक्के असून धरणात पाण्याची आवक ५९३ क्युसेक आहे. चारही दरवाजातून पाणी सोडण्यात येत आहे.
उरमोडी धरण : उरमोडी धरणात आजचा पाणीसाठा ५.४४० टीएमसी असून आजची उपयुक्त टक्केवारी ५३.०६ टक्के आहे. धरणात पाण्याची आवक २ हजार ७१२ क्युसेक होत आहे.
तारळी धरण : तारळी धरणात आजचा पाणीसाठा २.०७० टीएमसी असून आजची उपयुक्त टक्केवारी ३५.२७ टक्के आहे. धरणात पाण्याची आवक १ हजार ६९५ क्युसेक होत आहे.
मध्यम प्रकल्प असलेले धरण
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात देखील पाणीसाठा वाढला आहे. यामध्ये येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. नागेवाडी ५०.९६ टक्के, मोरणा ६५.०८ टक्के, उत्तरमांड ६९.५३ टक्के, महू ३५.६९ टक्के, हातगेघर ४७.६० टक्के, वांग मराठवाडी ५२.४३ टक्के पाणीसाठा झाला आहे.