सातारा जिल्ह्यात 400 आदर्श शाळा तयार करण्यात येणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । मुले घडवण्याचा पाया हा प्राथमिक शाळेत रचला जातो. त्यामुळे तेथील वातावरण चांगले असणे गरजेचे आहे. चांगल्या वातावरणात चांगली मुले घडतात. ती भविष्यकाळात घडवीत यासाठी सातारा जिल्ह्यात किमान ४०० आदर्श शाळा तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

सातारा येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारीअधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, नितीन धायगुडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, शाळा चांगल्या करणे गरजेचे आहे. शाळांसाठी चांगला निधी दिला जाईल. आपल्या शाळा आदर्श करण्यासाठी पालक आणि ग्रामस्थ यांनीही सहभाग घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरपंच, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी लोकांमध्ये या विषयी माहिती द्यावी. आजच्या या कार्यक्रमात पहिल्या टप्यात ५० शाळांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. ‘माझी शाळा आदर्श शाळा’ हा एक चांगला उपक्रम असून यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ या सर्वांनी सहकार्याने काम करावे. आदर्श शाळे सोबतच आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र ही जिल्ह्यात उभारण्यात यावीत. खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर त्यांचा विकास करावा.

यावेळी खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अशा आदर्श शाळा उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींना आवाहन करावे. सर्वांनी एकत्र काम करून हा उपक्रम राबवूया.

यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी ‘माझी शाळा आदर्श शाळा’ या उपक्रमाची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी केले. तर शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी आभार मानले. केले. यावेळी ई लर्निग व ई कामवाटप यांचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास ५० गावांमधील सरपंच, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.