सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. जिल्ह्यात सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी गट, गणांच्या रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गट, गणांची रचना लोकसंख्येच्या प्रमाणात तयार करून त्यावर जिल्हाधिकारी हरकती मागविणार आहे. त्यानंतर अंतिम प्रारूप यादी मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवली जाणार आहे.
आताच्या नव्या रचनेत जिल्हा परिषदेचे ६५ गट (विभाग) आणि पंचायत समितीचे १३० गण आहेत. यामध्ये सातारा पालिकेच्या हद्दवाढीमुळे सातारा तालुक्यातील दोन गट व चार गण कमी झाले आहेत. २०१७ च्या रचनेनुसार फलटण, खटाव व कोरेगाव तालुक्यांत प्रत्येकी एक गट, दोन गण वाढले आहेत. त्यामुळे याचा फायदा नेमका कोणाला होणार हे आरक्षणानंतरच समजणार आहे.
पालिकांच्या प्रभाग रचनेनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी गट, गणांच्या रचना करण्यासाठीचा कार्यक्रम ग्रामविकास विभागाने जाहीर केला आहे. यामध्ये जिल्ह्यात ६५ गट व १३० गण असतील. या गट, गणांची रचना महाबळेश्वर तालुक्यापासून करण्यात येणार आहे. मागील वेळी ही रचना खंडाळा तालुक्यापासून करण्यात आली होती. आता महाबळेश्वर तालुक्यापासून रचना आणि आरक्षण टाकले जाईल. यावेळेस सातारा तालुक्यातील सातारा पालिकेची हद्दवाढ झाल्याने येथील दोन गट (शाहूपुरी आणि गोडोली) व चार गण कमी झाले आहेत. फलटण, खटाव व कोरेगाव तालुक्यांत एक गट वाढला आहे, तसेच ६५ पैकी निम्मे गट हे महिलांसाठी राखीव असतील.
यामध्ये ३३ गट महिलांसाठी असून, गेल्या वेळच्या तुलनेत यावेळेस एक जादा गट महिलांना मिळणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणे टाकली जाणार आहेत. त्यामुळे कोणत्या गट, गणाला कोणते आरक्षण पडणार यावर इच्छुकांची गणिते अवलंबून राहणार आहेत.
असा आहे कार्यक्रम
निवडणुकीच्या प्रभाग, गट आणि गण रचनेनुसार प्रारूप प्रभाग रचना १४ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. २१ जुलैपर्यंत यावर हरकती घेतल्या जातील. प्राप्त हरकतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे २८ जुलैपर्यंत पाठविले जातील. या हरकतींवर विभागीय आयुक्त ११ ऑगस्टपर्यंत निर्णय घेतील. १८ ऑगस्टला नव्या रचनेला मान्यता देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
मागील वेळी अशी होती स्थिती
२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीवेळी जिल्ह्यात ६४ गट व १२८ गण होते. त्या वेळी खंडाळा तालुक्यापासून आरक्षण काढण्यात आले होते. त्यावेळची तालुकानिहाय गट, कंसात गणांची संख्या अशी आहे. खंडाळा ३ (६), फलटण ७ (१४), माण ५ (१०), खटाव ६ (१२), कोरेगाव ५ (१०), वाई चार (८), महाबळेश्वर दोन (४), जावळी ३ (६), सातारा १० (२०), पाटण ७ (१४), कराड १२ (२४).
नवी गट, गण रचना अशी असेल
महाबळेश्वर २ (४), वाई चार (८), खंडाळा ३ (६), फलटण ८ (१६), माण ५ (१०), खटाव ७ (१४), कोरेगाव ६ (१२), सातारा ८ (१४), जावळी ३ (६), पाटण ७ (१४), कराड १२ (२४). एकूण ६५ गट, १३० गण.