सातारा प्रतिनिधी | मुसळधार पावसाने गुरुवारी सातारा जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. सायंकाळनंतर आलेल्या पावसाने सर्वांची दैना उडवून दिली. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने पडलेल्या पावसाचा फटका अनेकांप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला देखील बसला. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा गुरुवारी सायंकाळी बामणोली गावात कोयना नदीच्या काठावर मुसळधार पावसामुळे अडकला. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बोटीतून प्रवास अशक्य झाला, त्यामुळे ताफा काही तास नदीकाठावर थांबला.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बामणोलीतून दरे गावाकडे जात होते. अचानक आलेल्या तुफान पावसाने कोयना नदीचा प्रवाह तीव्र झाला. बोटीने प्रवास धोकादायक ठरू शकतो, यामुळे ताफा नदीकाठावरच अडकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, काही तासानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर शिंदे यांचा ताफा पुन्हा त्यांच्या मूळगावी दरे गावाकडे रवाना झाला. स्थानिक प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे पावसाळ्यातील प्रवास आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि रत्नागिरीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रायगडला शुक्रवारी ‘ऑरेंज’ आणि शनिवारी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.