जिल्ह्यातील दोन तालुक्यात समावेश होणाऱ्या ‘या’ गावातील पाण्याचा तिढा सुटला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । आपल्या कानावर ‘एक घाव, दोन तुकडे’, अशी म्हण अनेकदा पडली असेल. मात्र, अशीच म्हण सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कराड या दोन्ही तालुक्यांचा समावेश होणाऱ्या एका गावाबाबत लागू होतेय. सातारा जिल्ह्यातील जंगलवाडी हे असं गाव आहे कि याचा निम्मा कराड आणि निम्मा पाटण तालुक्यात समावेश आहे. डोंगरावर वसलेल्या आणि सुमारे चारशे लोकवस्ती असलेल्या जंगलवाडी गावातील ग्रामस्थांची तऱ्हा ‘आधे इधर, आधे उधर,’ अशी आहे. या गावात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या खूप भासत असल्याने गावातील ग्रामस्थांनी टँकरची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाकडून गावात नुकताच टँकर सुरु करण्यात आला आहे.

दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून गावागावातील विहिरींचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे लोकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून देखील उपाययोजना केल्या जात आहेत. या दरम्यान, पाटण तालुक्यातील डोंगर माथ्यावर वसलेल्या जंगलवाडीतील गावकऱ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्रशासनाकडून सोडवण्यात आला आहे. यापूर्वी गावकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. महिलांना आठवड्यातून एकदा डोंगरातून चढउतार करून गमेवाडी येथील उत्तरमांड धरणावर कपडे धुण्यासाठी यावे लागत आहे. मात्र, आता जंगलवाडीत प्रशासनाकडून पिण्याच्या टँकर सुरु करण्यात आलेला आहे.

सध्या पाणी टंचाईने त्रस्त असलेलया जंगलवाडी गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाकडून पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे वाडीतील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे. दोन महिन्यांपूर्वी जंगलवाडी येथील ग्रामस्थांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे यांच्याकडे पाण्याबाबतचा प्रश्न मांडला. ग्रामस्थांच्या प्रश्नानंतर साळुंखे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा करत त्यांना जंगलवाडीतील पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल घेत मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधितांना तातडीने सूचना दिल्या. त्यानंतर जंगलवाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला.

या गावाचा समावेश पाटण आणि कराड या दोन्ही तालुक्यात होतो. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील नेते मंडळींना या गावात निधी देण्यासाठी अडचणी निर्माण होतात. यामुळे गावातील ग्रामस्थांना पुरेशा शासकीय सुविधा आता मिळू लागल्या आहेत. त्यामुळे गावचा विकास होऊ लागला आहे.

दोन विधानसभा मतदारसंघात गावचा समावेश होतो

कराड आणि पाटण या तालुक्याप्रमाणेच या गावाला मतदार संघही दोन आहेत. कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदार संघामध्ये या एकाच गावाची विभागणी झालेली आहे. गावातील काही घरे कराड उत्तर विधानसभा मतदार संघात येतात. तर काही पाटण मतदार संघात येतात. त्यामुळे डोंगरावर वसलेल्या या गावाकडे लोकप्रतिनिधी म्हणावे तेवढे लक्ष देत नसल्याचा ग्रामस्थांकडून अनेकदा आरोप केला जातो. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी त्यांच्या प्रयत्नातून या गावासाठी काही कामे केली असली तरी मूलभूत गरजांसाठी गावातील ग्रामस्थांना नेहमीच झगडावे लागते.

महसुली नोंदी वेगवेगळ्या ठिकाणी

गाव एकच; पण तालुके दोन असल्यामुळे त्याच्या महसुली नोंदी वेगवेगळ्या ठिकाणी विभागल्या गेल्या आहेत. परिणामी, ग्रामस्थांना त्यांच्या शासकीय कामासाठी हेलपाटे घालावे लागतात. जेमतेम साठ ते सत्तर घरे असणाऱ्या जंगलवाडी गावापासून पाटण 25 किलो मीटर तर कराड 35 किलो मीटर अंतरावर आहे. एकच असले तरी येथील पाटण तालुक्यात 45 घरे मोडतात आणि कराड तालुक्यात 15 ते 16 घरे मोडतात. त्यामुळे गावाच्या महसूली दोन्ही या दोन्ही तालुक्यात आहेत.

जंगलवाडी गावचा हळू हळू होतोय विकास …

स्वतंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरी आमच्या जंगलवाडी गावचा एकाच तालुक्यात समावेश करण्याचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. दोन्ही तालुक्यात गावचा समावेश असून गावच्या मध्यातून डांबरी रस्ता गेला आहे. रस्त्याच्या पलीकंदील बाजू पाटण तालुक्यात आणि अलीकडील बाजू कराड तालुक्यातील उत्तर विभागात मोडते. पूर्वी गावात सुविधा नव्हत्या. आता गावात रस्ता, पाण्याच्या अशा सुविधा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या असल्याची माहिती जंगलवाडी गावातील ग्रामस्थ हरी वीर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ बोलताना दिली.