सातारा प्रतिनिधी | पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते. या जलजन्य साथीला रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची सातत्याने तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या तपासणीत आठ गावांमधील पाण्याच्या स्रोतांमधील पाणी दूषित आढळून आले आहे. या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतींना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील एक हजार ४८४ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व संनियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत असतो. या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर असे वर्षातून दोन वेळा गावोगावच्या पाणी स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येते. ग्रामस्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करताना सार्वजनिक विहीर, कूपनलिकेच्या आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता, क्लोरिन पावडरचे नमुने, जलवाहिनी गळती, व्हॉल्व्ह गळती, पाणी टाकी परिसर स्वच्छता यासह अन्य घटकांची तपासणी करून मूल्यांकन केले जाते.
पाणी दूषित असलेली गावे
मायणी, वर्णे, कण्हेरी, कर्णवडी, झगलवाडी, लिंबाचीवाडी, कान्हवडी, मिरजे आदी गावे दूषित पाणी असणारी आहेत.