सातारा प्रतिनिधी | अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळीमुळे १ हजार ९८३ घरांची पडझड झाली आहे तर हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके देखील वाया गेली असल्याने या नुकसानीची भरपाई देण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. नुकसान भरपाईमध्ये सुमारे १५ कोटींचे वाटप केले जात असून यामध्ये पडलेली घरे, पशुधन, दुकानदार, टपरीचालकांच्या नुकसानीसह शेतीच्या नुकसानीचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीची देण्यात येत असलेली भरपाईची रक्कम ही नवीन दराप्रमाणे करण्याची सूचना शासनाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नुकसानीपोटी मिळणारी भरपाईची रक्कम ही वाढीव स्वरूपात मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. याचा फटका शेतीसह घरे, पशुधन, दुकाने, टपऱ्या, रस्ते, पूल आणि साकव यांना बसला होता. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून त्यांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर उपलब्ध निधीतून भरपाईचे वाटप सुरू झाले आहे.
अवकाळीचा सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला होता, तसेच जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडील रस्ते, पूल, साकव यांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची व सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्ते, पूल, साकवांची मिळून 790 कोटींची नुकसानीचा प्रस्ताव शासनाकडून मंजुरीला पाठविला आहे.
पहिल्या टप्प्यात अशा प्रकारे केले जातेय वाटप
पहिल्या टप्प्यात १५ कोटींचे भरपाईचे वाटप सुरू झाले आहे. यामध्ये १ हजार ९८३ घरांचे १ कोटी २ लाख रुपये, ६५ पशुधनाचे १२ लाख रुपये, साधारण एक हजार दुकानदार व टपरी चालकांचे एक कोटी, १२ लाखांच्या भरपाईचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये दुकानदारांना ५० हजार रुपये तर टपरीचालकांना १० हजार रुपये प्रमाणे वाटप होत आहे.
शेती पिकांचे ४ हजार ४३४ हेक्टर क्षेत्रावर नुकसान
शेती पिकांचे साधारण ४ हजार ४३४ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. यामध्ये शेती वाहून जाणे, पिकांच्या नुकसानीचा समावेश असून, १४ हजार ६८७ शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जाणार आहे. त्याच्या नुकसानीची रक्कम १२ कोटी ३८ लाख रुपये आहे; पण ही रक्कम जुन्या दराप्रमाणे काढण्यात आली होती. आता शासनाने नवीन दराने वाढीव भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतीच्या भरपाईची रक्कम वाढणार असून, शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळणार आहे.