सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून डोन्ग भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तसेच दुर्गम डोंगराळ भागात भूतस्खलन होऊन जीवित हानी देखील होण्याची शक्यता असते. दरम्यान, सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात सध्या पावसाचा जोर असून पावसाने ओढे नाले वाहू लागले आहेत. परळी खोऱ्यातील उरमोडी धरणाच्या पलीकडे असलेल्या कुरळबाजी गावच्या डोंगरावर वन हद्दीतील मातीचा भराव तसेच निलगिरीची झाडे उन्मळून पडली आहेत. येथील मातीचा भराव वन हद्दीच्या खाली असलेल्या शेतकऱ्यांच्या रानात येऊ लागला असल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात आज यलो एलर्ट दिला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी पावसाचा जोर कायम राहिला. पश्चिमेकडील तालुक्यात सरीवर सरी कोसळल्या. अधूनमधून ऊन पडले; मात्र काळवंडलेले आभाळ कायम राहून पाऊस धो-धो कोसळला. परळी खोर्यात या पावसाने हाहाकार उडवला आहे. डोंगरकपारीत दगडी निसटू लागल्या आहेत. ठोसेघर मार्गावर छोट्या दरडी कोसळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उरमोडी धरणाच्या पलीकडे असलेल्या कुरळबाजी डोंगरावर भूस्खलन होवू लागले आहे.
त्यामुळे मातीचा भराव तसेच निलगिरीची झाडे उन्मळून पडली आहेत. येथील मातीचा भराव पायथ्याला असलेल्या शेतीत येऊ लागला असल्यामुळे शेतीसह शेतकर्यांचे नुकसान होत आहे. जगन्नाथ कुरळे, शंकर कुरळे, आनंद कुरळे यांच्या शेतीच्या रानात मातीचा भराव वाहून येऊ लागला आहे. दरम्यान, मे महिन्याचा वळीव पाऊस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचा जोर वाढल्याने पश्चिमेकडे अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे या परिसरातील पेरण्याही खोळंबल्या आहेत.