सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळख असलेल्या पाचगणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाबळेश्वरचा वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. महाबळेश्वर मध्ये सुरु असलेल्या दमदार पावसामुळे वेण्णा लेक हा यावर्षी जून महिन्यात पूर्ण क्षमतेने भरल्याने लेकच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही शहरांचा पाणी प्रश्न मिटला आहे.
मागील वर्षी जुलै महिन्यात वेण्णा लेक भरला होता. यावर्षी जून महिन्यातच हा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. वेण्णा तलाव हा महाबळेश्वर आणि पाचगणीची जीवनवाहिनी मानला जातो. थंड हवेचे ठिकाण आणि महाराष्ट्रातील काश्मीर मानल्या जाणाऱ्या पाचगणी आणि महाबळेश्वर येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. यावेळी ते वेण्णा लेकला नक्की भेट देत असतात. पण मुसळधार पावसामुळे हा वेण्णा लेक ओव्हरफ्लो झाला असून याला लागून असलेला रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे या वेण्णा लेकच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटन स्थळांना याच तलावातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या वेण्णा लेक मधून पाणी ओसंडून वाहत असल्याने या ठिकाणी विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. पाऊस, ढगाळ वातावरण आणि रस्त्यावर उतरलेले ढग पाहण्यासाठी पर्यटक शनिवार आणि रविवारी हजेरी लावत आहेत. तर या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी घोडेस्वारीला पसंत केले जात आहे. महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने त्या परिसरातील नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत.