कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग; वेण्णा नदीकाठच्या ग्रामस्थांना इशारा

0
278
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास धरणात ३० टीएमसीवर पाणीसाठा झाला होता. त्याचबरोबर नवजा येथे आतापर्यंत ७०१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तालुक्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे धरणात पाण्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी रात्रीच्या सुमारास पायथा वीजगृहातून ५०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जून महिन्याच्या पहिल्या काही दिवसात पावसाने दडी मारली होती. पण, १२ जूननंतर जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला. पूर्व भागात पावसाची उघडझाप आहे. तरीही खरीप हंगामातील पेरणीला वेग येत चालला आहे. पण, पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सायंकाळनंतर अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू आहे. यामुळे कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरात जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे १३३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती, तर नवजा येथे १५८ आणि महाबळेश्वरला १५३ मिलिमीटर पाऊस झाला.

त्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाचा जोर होता. त्यातच कोयना धरणक्षेत्रातही धो-धो पाऊस पडतोय. यामुळे सायंकाळी पाचच्या सुमारास कोयनेत ४५ हजार १२१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. परिणामी धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. पाच वाजता धरणात ३०.०६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. २८.५६ पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. सातारा शहरातही पाऊस सुरूच आहे. गुरुवारी सकाळपासूनच पावसाची उघडझाप सुरू होती. काहीवेळा जोरदार सरी येत होत्या. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट घेऊनच जावे लागत होते. या पावसामुळे शाळकरी मुले आणि नोकरदारांचे हाल झाले. धरणात दोन टीएमसीने वाढ जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. तसेच कोयना धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या दरम्यानच्या ९ तासात कोयना धरणात जवळपास दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

कण्हेर धरणाच्या नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातमोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू झाला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दि. 20 जून 2025 रोजी सकाळी 6 पासून सांडव्या वरून वेण्णा नदी पात्रात अंदाजे 1000 क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येणाऱ्या येवानुसार धरणामधून सोडण्यात येणार्‍या विसर्ग मध्ये बदल करण्यात येईल. धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.