सातारा प्रतिनिधी | राज्यस्तरीय खरीप हंगाम 2024-25 साठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . या राज्यस्तरीय स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून सातारा जिल्ह्यातील 4 शेतकऱ्यांनी सर्वसाधारण गटामध्ये प्रथम द्वीतीय व तृतीय गुणानुक्रम मिळविल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पौक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होण्यास मदत होते. शेतकरी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना मिळू शकते व त्यामुळे राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत असतात.
पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांनी मिळवलेली उत्पादकता ही त्या पिकाच्या मागील पाच वर्षाच्या सरासरीच्या दीडपट किंवा त्याहून अधिक असल्यास ते राज्यस्तरीय, जिल्हा व तालुकास्तरावरील पुरस्कारासाठी पात्र ठरतात. अशा उत्पादक शेतकऱ्यांची निवड राज्यस्तरावर करण्यात येते. खरीप हंगाम सन २०२४ पीकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण ४ शेतकरी राज्यस्तरावर विजेते झाले आहेत. त्यामध्ये बाजरी पिकामध्ये शेतकरी शिवाजी चोपडे यांचा राज्यात प्रथम क्रमांक बक्षीस रक्कम रु. ५० हजार व शेतकरी तुकाराम मुळीक यांचा राज्यात तृतीय क्रमांक बक्षीस रक्कम रु. ३० हजार, ज्वारी उत्पादनात शेतकरी विठ्ठल मुळगावकर यांचा राज्यात द्वितीय क्रमांक बक्षीस रक्कम रु. ४० हजार तसेच सोयाबीन पिकामध्ये शेतकरी गणेश साळुंखे यांचा राज्यात द्वितीय क्रमांक बक्षीस रक्कम रु. ४० हजार असा गुणानुक्रम आला आहे. भात, बाजरी, मका, तूर, मूग आणि, उडीद या पिकांमध्ये २०२३ च्या तुलनेत सरासरी उत्पादकता वाढली आहे.
राज्यस्तरावरील विजेते ठरल्यानंतर, उर्वरित स्पर्धकांमधून जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर विजेते शेतकरी निवडले जाणार आहेत. सर्वसाधारण आणि आदिवासी गटांकरिता स्वतंत्र विजेते घोषित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते जाहीर करण्यात येणार आहेत, असेही जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकात कळविण्यात आले आहे.