सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या वळवाच्या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. अनेक शेतकर्यांना नियोजित वेळेत भाताची पेरणी करता आलेली नाही. परिणामी भात पेरणी लांबणीवर गेली आहे. तर भुईमूग पिकाचे नुकसान होवून ते कुजले आहे.
पश्चिम भागात भुईमूग हे एक महत्त्वाचे पिक आहे. सध्या पिक काढणीच्या टप्प्यावर असताना झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. जमिनीत जास्त आर्द्रता झाल्याने भुईमूगाच्या मुळांना मार बसल्याने पिके सडू लागली आहेत. काही भागात पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत.
शेतकरी वर्ग या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झाला आहे. यंदा आधीच खतांच्या वाढत्या किमती आणि मजुरांच्या टंचाईमुळे उत्पादन खर्च वाढला होता. आता या पावसामुळे भुईमूगाचे पीक गेलं. सरकारने तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या अनिश्चित हवामानामुळे आगामी हंगामात शेतीचे नियोजन करताना शेतकर्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली असून, त्याचा परिणाम भात पेरणीवर देखील होण्याची शक्यता आहे.