सदानंदाच्या यळकोटाने पालनगरी दुमदुमली, खंडोबा यात्रेला 6 लाखांवर भाविकांची उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खंडोबाच्या नावानं चांगभलं… यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात पाल (ता. कराड) येथील मल्हारी म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर संपन्न झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे सहा लाखांवर भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली. खोबरे आणि भंडाऱ्यात पाल नगरी न्हाऊन निघाली.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता. पाल यात्रेसाठी उंब्रज पोलीस व प्रशासनाने यात्रेत केलेल्या बदलांंमुळे यात्रा  सुखकर पार पडली. वाळवंटात बांधलेल्या पुलामुळे मिरवणूक मार्गावरील ताण कमी झाला.

 तारळी नदीपात्रातील दक्षिणोत्तर बाजू भंडारा उधळणाऱ्या भाविकांच्या गर्दीने खचाखच भरली होती. पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने  पिवळा धमक होऊन गेला. खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासन काट्या, पालखीसह देवस्थानच्या आकर्षक रथातून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेली शाही मिरवणूकीने भाविकांचे  लक्ष वेधून घेतले. 

दुपारी ३ च्या सुमारास खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सर्व विधी आटोपून दुपारी ४.१५ च्या सुमारास मानकरी देवराज पाटील देवाचे मुखवटे पोटावर बांधून अंधार दरवाजा जवळ आले. याठिकाणी ते रथात विराजमान झाले. तेथून मुख्य मिरवणूकीस सुरूवात झाली. मानकऱ्याचे गाडे, फुलांनी सजवलेल्या अबदागीरी, चोपदाराचा घोडा, सासन काठ्या, पालखी, मानाचे गाडे या पाठोपाठ शाही थाटात खंडेराया व म्हाळसा यांना रथातून घेवून निघालेले मानकरी, अशी भव्य दिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करत सदानंदाचा येळकोट घे… येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष केला.

नेहमी मुख्य मिरवणूक सुरु होताच या मार्गावर भाविकांची गर्दी होते. मात्र यंदा देखील ही गर्दी तारळीच्या वाळवंटात दिसून आली. मागील पाच वर्षाषापासून देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी व प्रशासन यांनी यात्रेपुर्व केलेल्या योग्य नियोजनामुळे तारळी नदी वरील मुख्य पूलावरील गर्दी नियंत्रित राहण्यासाठी मदत झाल्याचे दिसून आले. सायंकाळी वाळवंटातून देवाची शाही मिरवणूक  मारुती मंदिर मार्गे बोहल्या जवळ आली. यावेळी खंडेरायाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला.

देव मंडपात आल्यानंतर देवाला स्नान घालण्यात आले व देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले. पारंपारीक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर मोठ्या थाटात पार पडला. मिरवणूकीच्या वेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण राहावे म्हणून ठिकठिकाणी चोख बंदोबस्तासाठी बँरिगेटस् उभारले होते.  पाल  ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बदे तसेच विविध विभागांचे अधिकारी तळ यात्रास्थळी तळ ठोकून होते.