सातारा प्रतिनिधी | उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने अनेक भागात भूजल पातळीत घट होऊन टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे माण तालुक्यात २७ गावे २०८ वाड्यांना प्रशासनाकडून ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दुष्काळाची तीव्रता वाढू लागल्याने प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने प्रशासनाने टंचाईसदृश गावांमध्ये उपाययोजना सुरू केल्या होत्या. यावर्षी माण तालुक्यातील बिजवडी, मोही, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, जाशी, पांगरी, डांगिरेवाडी, थदाळे, भाटकी, संभुखेड, पळशी, मार्डी, खुटबाव, येळेवाडी, पाचवड, राजवडी, वावरहिरे, अनभुलेवाडी, पर्यंती, खडकी, रांजणी, इंजबाव, वारुगड, टाकेवाडी, दोरगेवाडी अशा २७ गावे व लगतच्या २०८ वाड्यांमध्ये टंचाई जाणवू लागली आहे.
दरम्यान, माण तालुक्याप्रमाणे कोरेगाव, फलटण, खटाव तालुक्यातही काही गावांमध्ये टंचाईची दाहकता जाणवत आहे. उन्हाळी पाऊस झाला नाही, तरी किमान अडीच महिने पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अशी आहे टंचाईची परिस्थिती…
१) शासकीय १० व खासगी २० टँकरद्वारे पाणीपुरवठा
२) ४३ हजार ९११ लोकसंख्या व २२ हजार २३८ पशुधनांसाठी सोय
३) आठ विहिरी व सहा बोअरवेलचे अधिग्रहण
४) माणप्रमाणे कोरेगाव, फलटण, खटावमध्येही टंचाईची स्थिती