जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; माण, खटावमध्ये ‘इतक्या’ टँकरने पाणीपुरवठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली, तरी माण, खटावसह अन्य तालुक्यांतील काही गावांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील 155 गावांतील 51 हजार 927 नागरिकांना 21 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे धरण, तलावांमधील पाणीपातळीही दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कडक उन्हाळा असल्यामुळे डिसेंबरपासूनच जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाई जाणवू लागली. त्यामुळे टँकरची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरच्या संख्येत घट होऊ लागली आहे.

माण तालुक्यातील पांगरी, मोही, डंगिरेवाडी, शेकरी, राणंद, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, खडकी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, मार्डी, पर्यंती, इंजबाव, वाकी अशी 18 गावे व 127 वाड्यांतील 43 हजार 975 नागरिकांना 14 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातील शिंदेवाडी, नवलेवाडी, गारळेवाडी यांसह 3 गावे व एका वाडीतील 2 हजार 20 नागरिक व 996 जनावरांना 3 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

कोरेगाव तालुक्यातील होसेवाडी, भाडळे, कवडेकाडी, बोधेवाडी (भा) या 4 गावांतील 5 हजार 297 नागरिक व 4 हजार 553 जनावरांना 3 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्यातील निंबोडीमधील 226 नागरिक व 351 जनावरांना एका टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. वाई तालुक्यातील आनंदपूर येथील 409 नागरिक व 185 जनावरांना एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी 14 विहिरी व 3 कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.