सातारा जिल्ह्यात 82 गावे अन् 404 वाड्यांत पाण्याचा ठणठणाट !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील बहुतांशी भागात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे दुष्काळी भागात पाण्याचा ठणठणाट असून टंचाईतही वाढ झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील 82 गावे आणि 404 वाड्यांच्या घशाला कोरड असून त्यासाठी 86 टॅंकर सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यात 2017-18 साली दुष्काळी स्थिती होती. त्यावेळी जवळपास 200 हून अधिक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, मागील 4 वर्षांत पर्जन्यमान चांगले झाले. त्यामुळे टंचाईची स्थिती फारशी उद्भवली नाही. मार्च-एप्रिलमध्ये टॅंकर सुरु झालातरी जूनपर्यंत तो सुरू राहत होता. मात्र, यंदा टंचाईची परिस्थिती गडद आहे. सप्टेंबर महिना सुरू झालातरी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झालेला नाही. पूर्व भागात कायम प्रतीक्षा असून पश्चिमेकडेच बऱ्यापैकी पडला आहे. त्यामुळे पश्चिमेकडे पाण्याची टंचाई नाही. मात्र, पूर्व भागातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या तालुक्यात टंचाई वाढू लागली आहे.

माणमध्ये 343 गावांना 60 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा…

जिल्ह्यातील माण तालुक्यात भयावह स्थिती आहे. एकूण 47 गावे आणि 343 गावांना 60 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टॅंकरवर सुमारे ७५ हजार नागरिक आणि 61 हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे. तालुक्यात पांगरी, वडगाव, बिजवडी, मोगराळे, पाचवड, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, रांजणी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटाबा, मार्डी, खुटबाव, पर्यंती, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, पिंगळी बुद्रुक, सुरुपखानवाडी, कुरणेवाडी आदी गावांसह वाड्यांवर पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे टॅंकर सुरू करण्यात आले आहेत.

खटावमध्ये 7.5 हजार जनावरांना 12 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा…

खटाव तालुक्यातही टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे सध्या १९ गावे आणि 24 वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहे. तालुक्यातील 26 हजार नागरिक आणि 7.5 हजार जनावरांना 12 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, पडळ, कान्हरवाडी, धोंडेवाडी आदीं गावांसह इतर वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

फलटणला 10 टँकर भागवतायत तहान…

फलटण तालुक्यातही टंचाई आहे. ८ गावे आणि ३७ वाड्यांसाठी १० टॅंकर सुरू आहेत. या टॅंकरवर १३ हजार ८२५ नागरिक आणि १४ हजारांवर जनावरांची तहान अवलंबून आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड, चांभारवाडी, घाडगेमळा आदी ठिकाणी टंचाई निवारणासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

कोरेगावात 6 गावांत पाणी टंचाई

कोरेगाव तालुक्यातही 6 गावांत टंचाई आहे. यासाठी 3 टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी येथे टंचाई असून 3.5 हजार नागरिक आणि 2 हजार पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच वाई तालुक्यातही 2 गावांना टंचाईची समस्या आहे.