कराड प्रतिनिधी | सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील २१ जागांसाठी कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यांतील ९९ मतदान केंद्रांवर आज शनिवारी (५) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चुरशीने मतदान होत आहे. कराड तालुक्यातील ४९ गावांत ६८, कोरेगाव तालुक्यात ८ गावांत १५, सातारा तालुक्यातील ५ गावांत ६, खटाव तालुक्यातील ३ गावांत ५ आणि कडेगाव तालुक्यातील ३ गावांत ५ मतदान केंद्रे असणार आहेत. सह्याद्री कारखान्याचे ३२ हजार २०५ सभासद मतदार असून ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणुकीसाठी १ हजार ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. मतदान साहित्य घेऊन सर्व पथके आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाली आहेत. त्यासाठी १८ एसटी बसेस, २ मिनी बस, २१ जीप अशी वाहनेही तैनात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. तसेच सीसीटीव्ही व व्हिडीओच्या माध्यमातूनही लक्ष राहणार आहेत.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या सह्याद्री कारखान्यासाठी प्रथमच भाजप आमदाराच्या नेतृत्वाखालील आघाडी टोकदार संघर्षास उतरल्याने सर्वदूर ही निवडणूक गाजत आहे. तिन्ही आघाड्यांनी जोरदार मोर्चेबांधणी करून, सर्व त्या ताकदीने निवडणूक जिंकायचीच, असा चंग बांधल्याने मतदान आणि निवडणूक निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.