सातारा प्रतिनिधी | आजपासून सर्वत्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना सुरुवात झाली. शाळेच्या पालिका दिवशी चिमुकल्यांनी शाळेत प्रवेश केला. यावेळी शिक्षक व शाळांतील इतर करणाऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. मात्र, अलीकडच्या काळात जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या घटू लागल्याने ती पटसंख्या वाढावी यासाठी गावपातळीवर ग्रामस्थांकडून देखील प्रयत्न केले जात असताना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका गावातील ग्रामस्थानी अनोखा निर्णय घेतला आहे. त्याची जिल्हाभर चर्चा होत आहे. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील ग्रामस्थांनी गावातील प्राथमिक शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा पाणी व घरकर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
फलटण येथील ग्रामपंचायतीची शनिवारी उपसरपंच रूपाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. दरम्यान, काही ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा जिव्हाळ्याचा विषय मांडला. गावात आदर्श प्राथमिक शाळा ही पहिली ते सातवीपर्यंतची आहे; पण शाळेचा दिवसेंदिवस पट कमी होऊ लागला आहे. त्यामुळे ग्रामसभेत शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची २०२५-२६ या आर्थिक वर्षातील घरपट्टी माफ करण्याचा ठराव मंजूर केला.
यावेळी सदस्य नानासाहेब कदम, प्रियांका पवार, समीर पवार यांनी त्यास अनुमोदन दिले. ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी सदस्य मनीषा माने, रवींद्र धुमाळ, महेश धुमाळ, सुभेदार हुंबे, विकास हुंबे, हनुमंत शिंदे, शुभम धुमाळ, संजय धुमाळ, विलास धुमाळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.