फलटणमध्ये २२ गावच्या ग्रामस्थांनी ट्रॅक्टरसह काढला मोर्चा; केली ‘हि’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील सुमारे 22 गावातील शेतकरी व नागरिकांनी ट्रॅकटरमधून फलटण येथील जलसंपदा कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मंगळवारी मोर्चा काढला. यावेळी या मोर्चामध्ये महिला व अबाल वृद्ध शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी मोर्चातील महिला व शेतकरी यांनी ‘अस्तरीकरण हटाव शेतकरी बचाव’, जल है तो कल है, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला

जलसंपदा विभागाकडून फलटण तालुक्यामध्ये तडवळे बंगला ते रावडी या ४किमीचे सिमेंट कॉंक्रीट मध्ये अस्तरीकरणाचे काम मागील काही दिवसांपूर्वी सुरू केले आहे. मात्र, या कामामुळे नीरा उजवा कालव्या लगत असणाऱ्या विहिरी व कुपनलिका, बोअरवेल बंद पडण्याची भीती आहे. या भीतीने या कामाला तालुक्यातील तडवळे, सुरवडी, मुरूम, रावडी बुद्रुक, रावडी खुर्द, खामगाव, होळ, डोंबाळवाडी, कुसुर, पाडेगाव, खराडेवाडी, निंभोरे, वडजल, भिलकटी, चौधरवाडी, साखरवाडी, सासवड, पाडेगाव, निंभोरे, तरडगाव, काळज, घडगेमळा या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये ठराव करून विरोध केला आहे.

दरम्यान, आज मंगळवारी फलटण येथे या गावातील हजारो शेतकरी, महिला व नागरिकानीं शेकडो ट्रॅक्टर मधून मोर्चा काढला. यावेळी फलटण-लोणंद या पालखी मार्गावर सुमारे ४ किलोमीटर मोर्चात सहभागी ट्रॅक्टरची रांग लागली होती. मोर्चातील ट्रॅक्टर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे दाखल झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पायी मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून मोर्चा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रांत कार्यालय येथे दाखल झाला. मोर्चातील सहभागी महिलांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग फलटणचे मिलिंद सपकाळ यांना निवेदन देण्यात आले. तसेच कोणत्याही परिस्थितीत हे काम करू नये अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.