वेळ आली तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदी हिटलरप्रमाणे वागतील; डॉ. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरने केले ते सगळे करतील यात शंका नाही. दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरू होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहील. गोध्रा हत्याकांड, मणिपूर दंगल घडली, त्याप्रमाणे पुन्हा घडण्याची शक्यता आहे, असा आरोप ‘वंचित’चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी करीत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

संविधान जनजागृती विचारमंचतर्फे काल अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त येथे आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी डॉ. आंबेडकर म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणूक जिंकावी, यासाठी नरेंद्र मोदी हे हिटलरने जे केले तेच करणार आहेत. जो विरोधात जाईल त्याचा आवाज दाबला जाईल. देशातील पाच हिंदू मंदिरांवर कारवाया करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी मिलिटरीच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी मी केली. तेथे बॉम्ब फोडून हिंदू- मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न होता. मात्र, तो बॉम्ब नि:शस्त्र केला. सध्या मुस्लिम घरात हिंदू मुलगी, हिंदू घरात मुस्लिम मुलगी आहे का, याचा शोध आरएसएस घेत आहेत. प्रेमविवाह न राहता ते आता धार्मिक विवाह झाले आहेत. लोकांची डोकी भडकवण्याची राजकीय खेळी सुरू आहेत.

…तर मोदी ‘इंडिया’ला संपवतील : डॉ. आंबेडकर

यावेळी डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘इंडिया’ आघाडी शेवटपर्यंत टिकावी, ही अपेक्षा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आमच्यावर कोणत्याही चौकशा नाहीत. त्यामुळे आम्ही बेधडक भूमिका घेत आहोत. ‘इंडिया’च्या बैठकीत खा. राहुल गांधी यांनी अदानीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आहे, अशी भूमिका मांडली. राष्ट्रवादी त्या भूमिकेबरोबर आहे, असे दिसत नाही. त्याबाबत अधिकृत निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा, त्याचा मोठा फायदा नरेंद्र मोदी घेतील. ‘इंडिया’ने ‘वंचित’ला घेतले नाही, तर मोदी ‘इंडिया’ला संपवतील.