सातारा प्रतिनिधी । विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरीत आगमन झाले. हा पालखी सोहळा नीरा पुलावर येताच फुलांचा वर्षाव अन् माउली…माउली अशा जयघोषात सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. चार दिवस सातारा जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या पालखी सोहळ्यात वयोवृद्ध वारकऱ्यांसह तरुण युवक देखील सहभागी झाले आहेत. लोणंद मुक्कामी असलेल्या पालखी सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील तीन युवक वारकरी मित्रांनी पोस्टद्वारे अनोखा संदेश देत वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
“पबला जाणारी नको, पंढरीच्या वारीला जाणारी हवी,” “पंढरीची वारी निर्व्यसनी मित्रांची यारी,” पैसा, मोह, माया यात माणूस हरवतो, पंढरीचा रस्ता मात्र मनाला सावरतो,” असे महत्वाचे तीन संदेश साताऱ्यातील तिघा युवक मित्रांनी वारीमधून दिला. त्यांनी लोणंद येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दाखल होत दर्शन घेतल्यानंतर पोस्टर हातात घेत वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी हातात धरलेले पोस्टर वरची येणारा भाविक कुतूहलाने पाहून पुढे जात होते.
साताऱ्यात काल मायलीची पालखी दाखल झाल्यानंतर आता लोणंद नगरीत विसावल्यानंतर जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यामध्ये कापडगाव येथील सरहद्देच्या ओढ्यावर आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
लोणंद येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सातारा शहरातील तिघे युवक मित्र सहभागी झाले. त्यापैकी एकाने हातात ‘पैसा, मोह, माया यात माणूस हरवतो, पंढरीचा रस्ता मात्र मनाला सावरतो,’ असा अनोखा संदेश दिला तर दुसऱ्या मित्राने ‘पंढरीची वारी निर्व्यसनी मित्रांची यारी म्हणजे व्यसनाधीन मित्रापेक्षा निर्व्यसनी मित्राची संगत धरावि, असा सामाजिक संदेश दिला आहे. तर तिसऱ्या मित्राने ‘पबला जाणारी नको, पंढरीच्या वारीला जाणारी हवी,” या संदेशातून होणारी बायको, मुलगी हि कशी असावी, असे सांगितले आहे.