खा. उदयनराजेंसह रणजित नाईक-निंबाळकरांकडून मोदींची भेट; केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आरक्षणाच्या प्रश्नावर नवी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर भाजपाचे राज्यसभा खा. उदयनराजे भोसले आणि माढाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच धनगर समाजाच्या मागणीनुसार त्यांचे आरक्षण बदलून देण्याची मागणी दोघांनी केली आहे.

आरक्षणावर भोसले-निंबाळकरांची मोदींशी चर्चा

मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भाने खासदार उदयनराजे आणि निंबाळकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट मागितली होती. त्यानुसार मोदींनी दोघांना भेटीची वेळ दिली. खा. उदयनराजे आणि खा. निंबाळकरांनी मोदींसमोर मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. या दोन्ही प्रश्नांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

उदयनराजेंनी मांडली मराठा समाजाची कैफियत

पंतप्रधान मोदींसमोर भोसले-निंबाळकर या दोन्ही खासदारांनी मराठा समाजाची कैफियत मांडली. मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे. मराठा समाज हा सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा समाज आहे. परंतु, या समाजाची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. शिक्षणाची फी भरणे देखील मुलामुलींना अवघड झाले आहे. शिक्षणानंतर नोकरीचीही श्वाश्वती नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती दोन्ही खासदारांनी केली.

अनुसूचित जातीमधून आरक्षण देण्याची मागणी

धनगर समाज अनेक वर्षे अनुसूचित जातीमधून आरक्षण मिळावे,यासाठी झटत आहे. इतर राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जातीमधून आरक्षण मिळाले आहे. मात्र, महाराष्ट्रात ‘धनगड’ शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही. आपण यामध्ये लक्ष घालून धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे आणि निंबाळकरांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

दिल्लीत छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारावे

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी नवी दिल्लीत ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली असता केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. साताऱ्यातील लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या जलपूजनाला येण्याचे निमंत्रणही उदयनराजेंनी मोदींना दिले.