आगामी निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळणार? BJP टिफीन बैठकीत उदयनराजेंनी आकडेवारीच सादर केली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने नुकताच टिफिन बैठकीचा कार्यक्रम घेण्यात आला. या बैठकीस खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे विधान केले. “आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजप सत्तेवर येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या विधानसभा निवडणुकीत राज्यात 288 आमदार आणि लोकसभा निवडणुकीत 48 खासदार भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट मिळून निवडून आणणार आहोत,’ असा दावा खा. उदयनराजे भोसले यांनी केला.

साताऱ्यात काल भाजपच्या पार पडलेल्या टिफीन बैठकीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, सुरभी भोसले, सुनील काटकर आदी उपस्थित होते. टिफीन बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी कांदा ठेचा भाजी-भाकरी भोजनाचा आस्वाद घेतला.

बैठकीवेळी खा. उदयनराजे म्हणाले की, काँग्रेसने देशाला गेली 70 वर्षे प्रगतीपासून व विकासापासून वंचित ठेवले आहे. महात्मा गांधींनी सत्तेचे विकेंद्रीकरण करा, असा संदेश दिला होता. मात्र, तो संदेश फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित ठेवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. परंतु आता काहीही झालं तरी 2024 च्या निवडणुकीत देशात पुन्हा भाजप येणार आहे. राज्यातील 70 टक्के लोक भाजपच्या बाजूने आहेत. त्यामुळे आपण महाविजय मिळवणारच आहोत.

कारण शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानेच स्वराज्य उभे केले आहे आणि या पद्धतीने आपले सरकार उभे राहिले पाहिजे. यासाठीच मी त्यांना भेटलो आहे. आगामी निवडणुका एकसंधपणे लढवून लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजपचे उमेदवार निवडून आणले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या विकास योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोचायला हव्या असल्याचे उदयनराजे यांनी म्हंटले.