पुतळ्याचे राजकारण करू नये असे म्हणत उदयनराजेंनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राजकोट (मालवण) येथे घडलेली दुर्घटना ही निश्चितच दुर्दैवी आणि अपघाती आहे. देशातील सर्व जाती, धर्मातील नागरिकांमध्ये या घटनेचे दु:ख आहे. पुतळा उभारणीतील कच्चे दुवे आणि निसर्गाची अवकृपा या आणि केवळ याच कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कोणी स्वत:च्या लाभासाठी राजकारण करुन भांडवल करु नये, असे आवाहन करत खासदार उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन करावे आणि वातावरणातील बदलांचा सखोल अभ्यास करुन, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वांना प्रेरणा देणारा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभारला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

खा. भोसले यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असून त्यांनी त्यामध्ये म्हंटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक कार्याचा आमच्यासह तमाम देशवासियांना सार्थ अभिमान आहे. त्यांची शिकवण आणि राज्यकारभार आजच्या घडीला सुध्दा अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेवून करोडो व्यक्तींनी आपल्या जीवनाची आदर्शवत वाटचाल केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अल्प आयुष्यातील, अतुलनीय आणि अजोड कार्य आपल्या सर्वांच्या जीवनातील प्रत्येक वळणावर एका दिपस्तंभा सारखे आहे.

सामाजिक स्तरातील सर्वांना सातत्याने प्रेरणा देणा-या अशा थोर महापराक्रमी राजाविषयी सर्वांनाच नितांत आदर आहे. राजकोट येथील पुतळा कोसळण्याची दुर्घटना निश्चितच प्रत्येकाच्या मनाला क्लेशदायीच आणि निषेधार्ह आहे. तथापि या घटनेचे भांडवल करणाऱ्याकडून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी कृत्ये होत असतील तर शिवविचारांचा पाईक असणाऱ्या कोणालाच ते मान्य होणार नाही. म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकांनी संयम बाळगला पाहिजे.

या घटनेच्या सखोल चौकशीअंती जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन व्हावे आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी भव्य पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा दिमाखात उभारला पाहिजे, अशी अपेक्षा खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे.