जिल्ह्यातील आदिवासी कातकरी कुटुंबांना मिळणार महत्वाच्या सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना (PM-JANMAN) या योजनेची सुरवात दि. १५ डिसेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. हि योजना प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते करण्यात नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ९ मंत्रालयांद्वारे ११ विशेष बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील एकही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहू नये याची दक्षता घेतली जाणार असून जिल्ह्यातील आदिवासी कातकरी कुटुंबांना मिळणार महत्वाच्या अकरा प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी हे या समितीचे सह-अध्यक्ष आहेत. या समितीची प्राथमिक बैठक नुकतीच झाली. तालुकास्तरावर उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी अंतर्गत आदिवासी कातकरी कुटुंबांना वैयक्तिक, सामुदायिक व सार्वजनिक अशा अकरा योजनांचा लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी तातडीने नियोजन व अंमलबजावणी करावी, असे आवाहन श्री. डुडी यांनी यावेळी केले.

तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कातकरी कुटुंबांचे प्राथमिक सर्वेक्षण दोन दिवसात करुन कोणत्या सुविधा उपलब्ध नाहीत त्याची कुटुंब निहाय माहिती संकलित करावी. व संबधित विभागांना देवून त्या बाबतची पूर्तता त्या विभागांनी तात्काळ करावी. तसेच घरकुलाचा लाभ देण्यासाठी आवास प्लस ॲप मध्ये या कातकरी कुटुंबांचे सर्वेक्षण ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करावे. जिल्हयातील कोणतेही कुटुंब सर्वेक्षणापासमन वंचीत राहणार नाही दक्षता घेण्याची सुचना श्री. खिलारी यांनी केली..

या योजनेच्या मार्गदर्शनासाठी व सर्वेक्षणा बाबतची गट विकास अधिकारी, तालुकास्तरावरील यंत्रणा, संबधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ऑपरेटर यांची कार्यशाळा जिल्हास्तरावर घेण्यात आली दि. २९ डिसेंबर पासून गावस्तरावरील सर्वेक्षण सुरु झाले असून गावस्तरावर कातकरी बांधवांनी जातीचा दाखला, आधारकार्ड, जनधन बँक खाते, शिधापत्रिका, उज्ज्वला गॅस जोडणी, आयुष्यमान भारत कार्ड, किसान क्रेडीट कार्ड, मनरेगा जॉबकार्ड इत्यादी सुविधांचा लाभ देण्यात येणार आहेत.

कातकरी आदिवासी प्रवर्गातील कुटुंबे नऊ तालुक्यातील कार्यक्षेत्रात

सातारा जिल्हयात कातकरी आदिवासी प्रवर्गातील कुटुंबे जावळी, कराड, खंडाळा, कोरेगांव, महाबळेश्वर, पाटण, फलटण, सातारा व वाई या तालुक्यातील ६९ ग्रामपंचायत कायक्षेत्रात प्रामुख्याने आढळून येत आहेत. या कुटुंबाना प्रामुख्याने घरकुल, पिण्याची सुविधा, रस्ता, विज जोडणी, शिक्षणा करीता हॉस्टेल, कौशल्य विकस अंतर्गत प्रशिक्षण, मोबाईल मेडीकल सुविधा, पोषण व्यवस्था, उन्नत आजिविका, मोबाईल नेटवर्क इत्यादी सुविधा विहित काल मर्यादेत देण्यात येणार आहेत.