सातारा प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्याकडून ऑरेंज व रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातून कोकणाकडे जाणाऱ्या घाट मार्गावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या घाटमार्गातून होणारी सर्व प्रकारची वाहतूक रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे आता नागरिकांना या घाट मार्गाने प्रवास करता येणार नाही. त्याचबरोबर महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील वाहतूक आता रात्रीच्या वेळी बंद राहणार आहे.
सातारा जिल्ह्यातून कोकणाकडे रायगडकडे जाण्यासाठी पोलादपूर आंबेनळी घाट महत्वाचा मार्ग आहे. या घाट मार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक देखील केली जाते. शिवाय पर्यटक कोकणाकडे जाण्यासाठी या घाट मार्गाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करतात. मात्र, सततच्या अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेत हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा घाट मार्ग रात्री सात ते सकाळी सात या कालावधीत बंद राहणार आहे.
कोकणकडे जाणाऱ्या या महत्वाच्या घाटमार्गात जास्तीच्या पावसामुळे तीनवेळा दरड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घाट मार्गावर दरड कोसळल्याच्या घटना घडल्यानंतर प्रशासनाकडून हा घाट मार्ग रात्री सात ते सकाळी सात या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या घाटमार्गावरून दिवसा प्रवास करता येणार आहे. दरम्यान पुढील आदेश येईपर्यंत हा घाट रात्रीच्या वेळी बंद राहणार आहे.