सलग दोन रात्रीत ‘त्यानं ‘ 31 घरांवर टाकला दरोडा; लाखो रुपयांसह दागिने घेऊन झाला पसार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात सध्या चोरट्यांकडून ग्रामीण भागात चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील वाई तसेच जावळी तालुक्यात सलग 2 रात्रीत चोरटयांनी तब्बल 31 घरावर दरोडा टाकून लाखो रुपयांसह दागिने लंपास गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. वाईत शुक्रवारी रात्री पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत 24 तर दुसऱ्या दिवशी रात्री जावळीत भिवडीतील 7 बंद घरे फोडून चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे. चोरट्यांनी भिवडीतील सात घरे फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, भिवडी (ता. जावळी) येथे शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी सात बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश करून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम पळविली. यामध्ये किसन चव्हाण यांच्या घरातून
३ तोळ्यांचे गंठण, सागर भिसे यांच्या घरातून अर्धा तोळ्याची अंगठी व 1 हजार 800 रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. बबन चव्हाण, कृष्णराव चव्हाण, रविकांत दरेकर, भरत चव्हाण, संपतराव तरडे यांचीही घरे अज्ञात चोरांनी फोडली. मात्र, त्यातून त्यांच्या हाती फार काही लागले नसल्याचे सांगण्यात आले.

मात्र, चोरट्यांनी घरातील कपडे, सामानाची तोडफोड व नासधूस केली. यावेळी गावातील एका घरातील कपाट चोरटे उचकटत असताना शेजारील घरातील व्यक्तीला जाग आली. त्याला आवाजावरून चोरीचा संशय आला. त्याने गावात चोर घुसल्याची तातडीने गावातील सरपंच व पोलिस पाटील यांना मोबाईलवरून माहिती दिली. मात्र, चोरटे पळून गेले. ग्रामस्थ घराबाहेर आले असता त्यांना काही घरांचे कडी-कोयंडे तोडल्याचे दिसले. त्यानंतर सरपंचांनी ग्रामपंचायतीचा भोंगा वाजवून सर्वांना धोक्याची सूचना दिली. या चोरीची माहिती पोलिस पाटलांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर कुडाळ पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे व सहकस्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.