यशवंतराव चव्हाण यांच्या भारतरत्न पुरस्काराची अजितदादा गटाच्या ‘या’ नेत्यानं केली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी साताऱ्यात नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली.

साताऱ्यात अमित कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय आणि वैचारिक योगदान लक्षात घेवून यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार आहे.

दिवंगत यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुवतारा आहेत. त्यांच्या विचाराचे वारसदार अनेक राजकीय पक्षात सामाजिक, राजकीय जवाबदारीने काम करीत आहेत. त्यांच्यासारख्या बहुजन समाजाचे हित जोपासणाऱ्या महान नेत्याचा गौरव व्हावा, अशी सर्वांची भावना आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व वैचारिक वारसदारांना एकत्रित करून यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्काराबाबत सामूहिक प्रयत्न करून करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.