सातारा प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला. “माउली माउली…ग्यानबा-तुकाराम” नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात शाही स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला. यावेळी उपस्थित माऊली भक्तांनी माऊली माऊलीचा जयघोष करत टाळ मृदुगांच्या आवाजाने नीरा नदीच पात्र दुमदुमून सोडलं.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांनी पुष्प अर्पण करुन व पोलीस बँड पथकामार्फत विविध धून वाजून स्वागत केले.

माऊलींच्या पालखी सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील नीरा स्नानाला परंपरागत महत्त्व आहे. पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पुर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापूर्वी माऊलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्हाची सीमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते. यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात.

आज दुपारी ठीक २ वाजून २० मिनिटांनी पालखी सोहळ्याने जुन्या नीरा पुलावरून दत्त घाटावर प्रवेश केला. टाळ व मृदुगाच्या जयघोषाने माऊलींच्या पादुका स्नानासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. माऊलींच्या स्वागतासाठी रांगोळी बरोबर वाद्यांचा निनाद सुरू होता. पालखी सोहळ्याच्या मानकऱ्यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांना स्नान घातले गेले यानंतर प्रशासनातर्फे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. माऊलींना शाही स्नान व पाद्य पूजा पादुकांना शाही स्नान घालून माऊलींच्या पादुकांना चंदन उटी व तुळशीहार अर्पण करून पाद्य पूजन करण्यात आले. यानंतर सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. परंपरे प्रमाणे नीरा नदीकाठी विसावा घेतल्यानंतर माऊलींच्या पादुकांचे दत्त घाटावर शाही स्नान सुरू होते. भक्तांचेही स्नान झाले व सोहळ्याला नवी ऊर्जा मिळाली. यावेळी हजारोच्या संख्येने वारकरी, भक्त उपस्थित होते.