सरसकट आले खरेदीच्या निर्णयानंतर काढलं परिपत्रक; जिल्ह्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांना होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शेतकरी व इतर घटकांकडून बाजार आवार आणि शेताच्या बांधावर आल्याची खरेदी करताना ती परंपरागत सरसकट पद्धतीनेच खरेदी करावी, अशा सूचना सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आपल्याकडील अधिकृत परवानाधारक व्यापारी व अडत्यांना कराव्यात, नवीन व जुने आले वेगळे आणण्याचा आग्रह धरू नये, असे परिपत्रक राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, पणन संचालनालयाच्या वतीने नुकतेच काढण्यात आले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातीलही शेकडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

सध्या आल्याला चांगला दरही मिळत आहे. पण, आले खरेदी करताना व्यापारी प्रतवारी करत होते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. या विरोधात जून महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लढा उभारण्यात आला. त्यावेळी उपनिबंधक कार्यालयाने बाजार समिती तसेच व्यापाऱ्यांनाही सरसकट आले खरेदीबाबत सूचना केली होती. तर आता महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालयाने परिपत्रकच काढण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अनेक तालुक्यात आले पीक घेतले जाते. आले पिकातुन चांगल्या प्रकारे पैसे मिळत असतात. मात्र, राज्यातील आले उत्पादक शेतकरी हा व्यापारी आणि दलाली यांच्या मनमानी कारभारामुळे भरडला जातो. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. यावर पणनमंत्र्यांबरोबर बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी जुने आणि नवे आले अशी प्रतवारी न करता खरेदी करावी. प्रतवारीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, अशी मागणी केली होती. त्यामुळे पणनमंत्र्यांनी आले खरेदीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील सर्वच बाजार समित्यांना सूचना केली होती. त्यानुसार पणन संचालयाच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले.

बाजार समितीने परंपरागत पध्दतीने सरसकट आले खरेदीबाबत अधिकृत परवानाधारक व्यापारी व अडते यांना सूचना करावी. जुने व नवे आले वेगळे आणण्याचा आग्रह धरु नये. आले खरेदीचा व्यवहार झाल्यावर साैदा पट्टी करावी. त्यावर दर कसा दिला याचा उल्लेख अधिकृत बिलावर करावा. काही तक्रारी आल्यास बाजार समितीने तत्काळ निवारण करावे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे