माझ्याकडचे 2 लाखाचे औषध घ्या मग महिला गरोदर होईल असं म्हणून भोंदूगिरी करणारी टोळी गजाआड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा – अपत्य प्राप्तीच्या अमिष दाखवून भोंदूगिरी करत लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या चौघांच्या टोळीला तळबीड पोलिसांनी गजाआड केले आहे. संशयितांना आज कराड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. राहुल धरमगिरी गोसावी, अश्विन अशोक गोसावी, शैलेश सुरेश गोसावी आणि देवेंद्र ज्ञानेश्वर पवार, अशी संशयितांची नावे आहेत. तीन संशयित हे धुळे जिल्ह्यातील साक्रीचे तर एकजण जळगावच्या जामनेर तालुक्यातील आहे. संशयितांमधील राहुल धरमगिरी गोसावी हा आपले नाव नारायण वाघ असल्याचे तसेच आपण वैद्य आहोत, असे लोकांना सांगत होता.

अपत्य नसलेल्या तळबीड येथील एका दापत्याशी संशयिताने २१ जुलै रोजी मोबाईलवर संपर्क साधला. नारायण वाघ असे नाव सांगितले. आपण वैद्य असून आपल्या औषधाने अपत्य होवू शकते. तुम्हाला आमच्या मठाची ११ हजार रुपयांची पावती करावी लागेल, असे सांगून दापत्याचा विश्वास संपादन केला. त्याच दिवशी चार जण कारमधून (क्र. एम. एच १८ बी. एक्स. ४५६०) आले. अपत्य होण्याची औषध महाग असल्याचे सांगून नंतर स्वतः जवळची तसेच शाही एजन्सी आयुर्वेदीक मेडीकल, सातारा येथून १,७६,५०० रुपयांची औषधे दिली.

सर्व संशयित १४ ऑगस्ट रोजी तळबीड येथे आले. मेडीकलमधील किटने दाम्पत्याची टेस्ट करुन सदर महिला गरोदर असल्याचे सांगितले. अशी टेस्ट कोणत्याही डॉक्टरकडून करून घेतल्यास टेस्ट निगेटीव्ह येईल, असे सांगून त्यांना २,६०,००० रुपयांची औषधे घ्यायला सांगितली. दाम्पत्यास त्याचा संशय आला. औषधासाठी आता पैसे नाहीत. पैसे जमले की घेतो, असे सांगून त्यांना परत पाठवले.

भोंदूगिरी करणारी टोळी दाम्पत्याला औषधे घेण्याकरीता वारंवार फोन करीत होती. म्हणून त्यांनी कराड येथील डॉक्टरकडे नियमीत टेस्ट केली. तसेच सोनाग्राफी केली असता महिला गरोदर नसल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दाम्पत्याने चार संशयितांच्या विरोधात तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, हवालदार आप्पा ओंबासे, योगेश भोसले, अभय मोरे, नीलेश विभुते, प्रवीण गायकवाड यांनी भोंदूगिरी करणाऱ्या टोळीतील संशयितांना अटक केली. राहुल धरमगिरी गोसावी हा आपले नाव नारायण वाघ वैद्य असल्याचे सांगून वावरत असल्याची बाब उघडकीस आली. या टोळीने सातारा जिल्ह्यात बऱ्याच लोकांची अशा प्रकारे फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.