सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देवू; आ. शिवेंद्रराजेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | देगाव एमआयडीसीचे शिक्के उठवणाऱ्यांनी सातारकरांचे नुकसान केले आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन सातारा जिल्ह्यातील जनतेला स्वाभिमान शिकवू नये. विकासाच्या आड येणारे सातारकरांना स्वाभिमान शिकवत असतील तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देवू, असा इशारा आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.

खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारानिमित्त सोनगाव (ता. सातारा) येथील सप्तपदी मंगल कार्यालयात झालेल्या शेंद्रे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. खा. उदयनराजे भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

उदयनराजेंच्या विरोधात जे उमेदवार आहेत, त्यांनीच विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून मविआ सरकारच्या काळात देगाव एमआयडीसीला खो घातला होता. साताऱ्याच्या विकासाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात आपण सर्वांनी उभे राहण्याची वेळ आली आहे. सातारा तालुक्यात आपली स्वतंत्र ताकद आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या संघर्षानंतरही आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. खासदार उदयनराजे आणि माझ्यात कुठलेही राजकीय सेटिंग झालेलं नाही तर विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा भाजपला सत्तेवर आणायचे असल्याचे आ. शिवेंद्रराजे म्हणाले.

घटना बदलली जाणार असल्याचा चुकीचा प्रचार विरोधी नेत्यांकडून सुरू आहे. वास्तविक मोदी-शहा यांनी घटनेला हात लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मते मिळवण्यासाठी आंबेडकरप्रेमी जनतेला फसवण्याचे काम विरोधक करत आहेत, अशी टीकाही आ. शिवेंद्रराजेंनी केली. भाजपाच्या माध्यमातून सातारा शहरासह तालुक्याचा विकास करायचा आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलेली एकी पुढे विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच गाव पातळीवरील निवडणुकांत देखील कायम ठेवायची असल्याचे सुतोवाच आ. शिवेंद्रराजेंनी यावेळी केले.

मेळाव्यास जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर, अरविंद चव्हाण, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, विजय पोतेकर, संपतराव साळुंखे, सुरेंद्र देशपांडे, संजय पोतेकर, सूर्यकांत पडवळ, विश्वास नावडकर, प्रशांत पोतेकर, सुनील जाधव, संजय साळुंखे, अजिंक्यतारा सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, नामदेव नावडकर, अंकुश जाधव, मोहनराव साळुंखे, राजेंद्र यादव उपस्थित होते.