सातारा प्रतिनिधी | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व चबुतर्यास कोणताही धोका नाही. पुतळा परिसरातील काम अद्याप सुरू आहे. खचलेला भराव दुरुस्त करण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्याचे स्पष्टीकरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून परिसर सुशोभित करण्यात येत आहे. छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमीन खचल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास व चबुतर्यास कोणताही धोका नाही. तसेच दुरुस्तीचे काम राज्य शासनाच्या वतीने तातडीने हाती घेण्यात आले आहे.
अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. हा पुतळा उभारण्यासाठी भराव करण्यात आला होता. जादा पाऊस झाल्यामुळे भरावातील माती खचली आहे. भराव दुरुस्ती तत्काळ करावी, अशा सूचना यंत्रणांना दिल्या असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.